धवल चारित्र्याचे नेतृत्व-शिवाजीराव पाटील निलंगेकर
———————————————-
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला आणि पुरोगामी महाराष्ट्राची जडण घडण सुरु झाली. तत्कालीन महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते म्हणजे स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण ,शंकरराव मोहिते पाटील हे होते.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं नेतृत्व हे जनसामान्यातून फुललं होतं.बालपणीच पितृछत्र हरवलेलं.माता वत्सलाबाईंनी अत्यंत धीरानं सर्व प्रतिकुलतेवर मात करत त्यांना लहानाचं मोठं केलं.आईची जीवापाड माया आणि तिने घेतलेले कष्ट या मातृवत्सल शिवाजीरावांनी आयुष्यभर विसरले नाहीत.तिच्या संस्काराचा हयातभर विसर पडू दिला नाही.सत्तेच्या सर्वात अनेक नेते प्रवाहपतीत झाले.परंतु निलंगेकर साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात धवल चारित्र्याचे नेते म्हणून तळपत राहिले.तब्बल पन्नास वर्षाचा कालखंड त्यांचा महाराष्ट्राच्या सत्ताकारणात गेला परंतु हा नेता कधी उतला नाही, मातला नाही.सामान्य जनतेशी जोडलेली नाळ त्यांनी कधी ढळू दिली नाही. महाराष्ट्राच्या सर्वोच्च मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले परंतु त्यांचे पाय सदैव या मातीशी नातं सांगत राहिले. निलंगेकर ही बिरुदावली त्यांनी या कारणानेच आजन्म गौरवाने मिरवली.स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाने जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या मनात वसलेलं होतं.प्रस्थापितांना गोंजारत न बसता सामान्य जनांची सोबत असणं यालाच त्यांनी प्राधान्य दिलं.
अनेक खात्यांची मंत्रीपद त्यांना मिळाली.सर्वोच्च मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं.या सर्व पदावरुन काम करताना जनसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी दूरदृष्टीने घेतले.शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या उन्नतीसाठीचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी खेचून आणले.दळणवळणाच्या सोयी निर्माण केल्या.शिक्षणाची दारे महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून खुली केली.अभियांत्रिकी शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देऊन गरीबा घरच्या पोरांची शिक्षणाची स्वप्न त्यांनी पूर्ण केले.महाराष्ट्रात लौकिक निर्माण करणारं महाराष्ट्र फार्मसी कॉलेज त्यांनी स्थापन केलं.निलंगा सारख्या छोट्याशा तालुक्याच्या गावी भव्य दिव्य आणि देखणं शैक्षणिक संकुल उभं केलं.तालुक्यातील महत्वाच्या गावात महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून शाळांचं जाळं विणलं.त्यामुळे गावागावातील तरुण मुलं शिक्षण घेऊन आत्मनिर्भर झाली.त्यांचे कुटुंबीय कायम निलंगेकर साहेबांचे ऋणांकित आहेत. त्यांच्या रुपात एक कर्मयोगी अनुभवायला मिळाला.मूल्याधिष्ठित राजकारणाचा वस्तुपाठ दादासाहेबांनी कृतीतून समोर आणला.पक्षनिष्ठा त्यांनी कधी ढळू दिली नाही.
दादासाहेबांना हे यश सहज मिळालेलं नाही. प्रचंड संघर्ष करुन सिद्ध झालेलं हे नेतृत्व आहे.शेतकरी कामगार पक्षाचा त्या काळी प्रचंड बोलबाला होता.अनेक खंबीर विरोधक समोर होते.परंतु अत्यंत सयंमानी या सर्व परिस्थितीत सामान्य जनांचे प्रेम मिळवत निलंगेकर साहेब स्वत:ला घडवत गेले.विरोधकांची रेषा खोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही तर स्वत:ची रेषा ते वाढवत राहिले.गावागावात जीवाभावाची माणसं त्यांनी जोडली.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर होता.सर्व जातीधर्माच्या सामान्यजनांना त्यांनी आपलं मानलं.अनेक मानसन्मानाची पदे त्यांना देऊन नवनेतृत्वाची फळी त्यांनी उभी केली.त्यांच्या नेतृत्वात अनेक माणसं समाजासमोर कर्तृत्ववान म्हणून पुढे आली.गुणग्राहकता हा निलंगेकर साहेबांचा विशेष होता.पाहताक्षणी माणसांना जोखण्याची किमया त्यांना साधली होती.प्रस्थापितांपेक्षा सामान्यजनांवर त्यांचा विश्वास होता.प्रस्थापित जवळ येतात ते स्वार्थ घेऊन परंतु सामान्य जनांचं तसं नसतं याची त्यांना जाणीव होती.त्यामुळे नेहमीसाठी सामान्यांचा जनाधार त्यांनी पसंद केला.माझे एक सहकारी गोविंदराव नाईकवाडे होते.अत्यंत सामान्य कुटुंबातील हा ईनामवाडी गावचा तरुण.त्यांच्या डोळ्यातील निष्ठा साहेबांनी जोखली.महाराष्ट्र शिक्षण समितीच्या प्राथमिक शाळेत त्यांना नोकरी देऊन आधार दिला.त्या काळी साहेब निलंग्यात आल्यापासून निलंग्यातून बाहेर जाईपर्यंत सावलीसारखी सोबत गोविंदराव नाईकवाडे द्यायचे.ईनामवाडी हा निलंगा नगर परिषद हद्दीतील प्रभाग.या प्रभागातून त्यांना उमेदवारी दिली.सभापती पद दिलं.त्यांचं अकाली निधन झालं.साहेब स्वत:कुटूंबीयाच्या सांत्वनाला गेले.सर्वांना धीर दिला.उघड्यावर पडलेल्या कुटूंबावर मायेची पाखर घातली.मी सोबत आहे याची जाणीव दिली.नाईकवाडे सरांच्या संतोषला महाराष्ट्र शिक्षण समितीच्या सेवेत सामावून घेतलं.संतोष देखील वडिलांचा वारसा चालवत निलंगेकर कुटुंबीयांच्या प्रती निष्ठा ठेवून सेवेसाठी सदैव तत्पर आहे.त्याचा मुलगा भवानीप्रसाद देखील निलंगेकर कुटूंबातील सदस्या प्रमाणे काळजी घेताना दिसतो आहे.तब्बल तिन पिढ्या उगीच नाही जीवापाड प्रेम करतं!अशी अनेक कुटूंबं निलंगेकर साहेबांनी जोडलेली आहेत.ती आज देखील निलंगेकर कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी आसुसलेली आहेत.फक्त ती अदृष्य आहेत एवढचं!..…गावागावात आणि घराघरात निलंगेकर साहेबांनी जोडलेली,उपकृत केलेली माणसं जीवंत आहेत तोपर्यंत निलंगेकर कुटुंबीयांना राजकारणातून दूर करणं विरोधकांना शक्य नाही…. ती त्यांची दिवास्वप्न ठरतील…निलंगेकर साहेबांच्या पुण्याईत ही दिवास्वप्न वहात जाणार यात शंका नाही….दादासाहेबांना पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन….
बालाजी जाधव उजेडकर