• Wed. Apr 30th, 2025

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आदित्य ठाकरेंची मिळणार साथ

Byjantaadmin

Nov 9, 2022

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ असताना कृषिमंत्री कुठेही दिसत नाहीत. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना कृषिमंत्री आणि घटनाबाह्य सरकार गायब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारमध्ये महिला सुरक्षित नसल्याची टीकाही केली. दरम्यान, त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आदित्य ठाकरेंची साथ मिळणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, राज्यात हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कोणी काही बोललं की, चौकशी लावा, तुरुंगात टाका, तडीपार करा… हे सगळं चाललं आहे. हे सर्व हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे, किंबहुना हुकूमशाही आलीच आहे. सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारता, किशोरी पेडणेकर यांना छळता, ऋतुजा लटकेंना छळलं… महिलांचा छळ सुरू आहे. आज राजकीय लोकांना सतावत आहेत; उद्या पत्रकारांनादेखील छळतील, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed