मणिपूरमध्ये महिलांबरोबर घडलेल्या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट समोर येत आहे. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मणिपूर दोन महिन्यांपासून जळत असताना मोदी 77 दिवसांनी यावर बोलले आणि त्यातही राजकारण केले असे प्रियांका गांधी म्हणाल्या.मेईतेई आणि कुकी यांच्यातील वाद विकोपाला पोहोचल्याने सुमारे दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. त्यात बुधवारी महिलांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर गुरुवारी संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबत निवेदन केलं. त्यावरून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी
“दोन महिन्यांपासून संपूर्ण मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. लोकांची घरे जाळली जात आहे. एकमेकांच्या हत्या केल्या जात आहेत. मुलांच्या डोक्यावर छत राहिले नाही. असे असताना आपले पंतप्रधान 77 दिवस काहीही बोलले नाही. कारवाई सोडाच पण एक शब्दही काढला नाही. एक अत्यंत भयावह व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाईलाजाने त्यांना बोलावे लागले. त्यामुळे नाइलाजाने ते एक वाक्य बोलले आणि त्या एका वाक्यातही त्यांनी राजकारण केले. त्या वाक्यातही त्यांनी ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांची नावे त्यांनी घेतली,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
काय म्हणाले होते मोदी
मोदींनी बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत आणि किती आहेत हे बाजूला राहू द्या. पण हा अपमान संपूर्ण देशाचा आहे. 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणे आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यास सांगतो. माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचला.
पंतप्रधान म्हणाले की, या देशात, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात किंवा कोणत्याही राज्य सरकारमध्ये, राजकीय वाद-विवादाच्या वर उठून कायदा आणि सुव्यवस्था आणि बहिणींचा सन्मान यांना प्राधान्य आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींचे जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही.