पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर बरसलेल्या दमदार सरींमुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक मार्ग बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुटी जाहीर करण्याचे केले आहे.
नांदेड : शहरालगत असलेल्या आसना नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. कामठा येथील साईनाथ चुनुरकर (नय १६) व रमेश आठवले (वय १७) हे दोघे पोहण्यासाठी दुपारी नदीत गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरकिांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोरठा येथील एका पुलावर पाणी आल्याने वाहतूक दोन तास बंद होती.
मुंबई : कोकणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण परिसरातील वाशिष्ठी नदीतील पुराने धोकापातळी गाठली आहे. परिणामी चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पूरस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.