पुणे : जुलै महिना अर्धा संपलेला असताना राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी
राज्यात गेल्या सात दिवसांपासून फारसा पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासून कोकण विभागात पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनने दिलासा दिला. कोकण विभागात सक्रिय झालेला मान्सून उर्वरित महाराष्ट्रात कधी दिलासा देतो याची आता प्रतीक्षा आहे. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर किंचित वाढू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या प्रादेशिक अंदाजानुसार मंगळवारपर्यंत कोकण विभागात बहुतांश सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रात रविवारपासून पावसाची व्याप्ती वाढू शकते. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातही रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि त्यानंतर बहुतांश सर्व ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढल्याचे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.