पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून भाजपनं तृणमूल काँग्रेसला घेरलं आहे. ममता बॅनर्जींनी लोकशाहीला कलंक लावल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर जळजळीत टीका करण्यात आली आहे. ‘लोकशाहीच्या नावानं भाजप काढत असलेला गळा हे ढोंग आहे. मोदी व शहांनी जागोजाग लोकशाहीला वधस्तंभावर चढवलं आहे, असा घणाघात ‘सामना’तून करण्यात आलाय.’बंगालचे युद्ध’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीचे निकाल व राजकारणावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘पंचायत निवडणुकीत भाजपनं सगळी ताकद पणाला लावली होती, पण ममता वाघिणीसारख्या झुंजल्या. त्यामुळं आता भाजप केकाटतो आहे, असं ‘सामना’नं म्हटलंय. राज्यातील हिंसाचारासाठी भाजपनं तृणमूलला जबाबदार धरलंय. भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची कारणं जाणून घेण्यासाठी आलेत. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर हल्ला चढवलाय.
‘केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या पाठवूनही ४० मृत्यू झाले असतील तर ते केंद्राचं अपयश आहे. मुळात ग्रामपंचायत निवडणुकांत केंद्रानं नाक खुपसण्याची गरज नव्हती. आता रविशंकर प्रसाद सत्यशोधन करण्यासाठी बंगालात पोहोचले. हासुद्धा एक घोटाळाच आहे. ममतांनी लोकशाहीला कलंक लावल्याचं ते म्हणत आहे. पण मुळात देशात लोकशाही उरली आहे काय? या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकत नाही. प्रसाद यांनी लोकशाहीच्या नावाने गळा काढला हे ढोंग आहे. मोदी व शहांनी तर जागोजाग लोकशाहीस वधस्तंभावर चढवले आहे, अशी तिखट टीका ‘सामना’नं केली आहे.’पश्चिम बंगालच्या हिंसाचाराचं भांडवल करणारे भाजपचे सत्यवादी मणिपुरातील हिंसाचारामागचं सत्यशोधन करण्यासाठी का गेले नाहीत? मणिपूरला कोणत्याही निवडणुका नाहीत तरी संपूर्ण राज्य पेटले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी सोडाच, तर भाजपचे एकही राष्ट्रीय पोपटलाल बोलायला तयार नाहीत. प. बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजप छाती पिटून घेत आहे, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आलाय.
भाजपची खरी चिंता कोणती?
‘लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प. बंगाल हे महत्त्वाचं राज्य आहे. मागच्या वेळी भाजपनं तिथं १८ जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी ते अशक्य दिसतंय. दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून दोन निवडणुका जिंकल्या, पण आता ते शक्य नाही. आग लावणाऱ्यांना ती विझवायचीही अक्कल लागते. स्वार्थासाठी आपलाच देश पेटवून मजा बघायची हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकतं. केंद्रीय बळ वापरून व दंगली पेटवूनही भाजपचा पराभव होतो हे प. बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिलं. भाजपची खरी चिंता हीच आहे, असा टोलाही अग्रलेखात शेवटी लगावण्यात आला आहे.