• Tue. Jun 24th, 2025

तुमची ती कुटनीती, मग आमचे काय? तुम्ही विदूर, चाणक्याच्या पोटातून जन्माला आलाय का?

Byjantaadmin

Jul 14, 2023

मुंबई : आम्हीncp  गेलो ही आमची कुटनीती आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीसोबत जाणं याला बेरजेचं राजकारण म्हणतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानांचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीसोबत जाणं तुमची कुटनीती होती, मग आमचं काय होतं? राष्ट्रवादीसोबत जाणं तुमचं बेरजेचं राजकारण होतं. तर आमचं काय होतं? असा सवाल करतानाच तुम्ही विदूर आणि चाणक्याच्या पोटातून जन्माला आलाय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.ठाणे जिल्ह्यात दोन हास्य जत्रेचे शो पाहिले. कुठे फू बाई फू. कुठे हवा येऊ द्या. कुठे हास्यजत्रा सुरू होतं. ठाणे जिल्ह्यात बाजूबाजूला काल दोन शो पार पडले. देवेंद्र फडणवीस आणि फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचे हे शो होते. मी हास्यजत्रा किंवा विनोदी कार्यक्रम का म्हणतो? उद्धव ठाकरे पोहरादेवीची शपथ घेऊन खोटे बोलले, असं फडणवीस म्हणाले. खरं तर हा पोहरादेवीचा अपमान आहे. सकाळपासून त्या समाजातील नेत्यांनी सांगितलं, फडणवीस वारंवार आमच्या पोहरादेवीचा अपमान करत आहेत. पोहरादेवीची कोणी खोटी शपथ घेत नाही. ते जागृत देवस्थान आहे. पण ही खोटारडी लोकं पोहरादेवीलाच खोटं पाडत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तुमची कुटनीती, आमचं काय?

फडणवीस म्हणतात, आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो हा अधर्म आहे. अधर्म असला तरी कुटनीती आहे. मग आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो ते काय होतं? तुम्ही जाता ती कुटनीती. विदूर नीती, चाणक्य नीती मग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली, हे काय होतं? याचं उत्तर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवं. वैफल्यग्रस्त असल्याने चुकीची विधाने करू नका. तुमचं हसं होतं. तुमची ती कुटनीती मग आमचं काय? आमची कोणती नीती? असा सवाल राऊत यांनी केला.

त्याच बेरजेच्या राजकारणात तुम्ही सत्ता भोगली

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आले ही सुद्धा या राज्याची गरज आणि कुटनीतीच होती. तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. ठाण्यातील दुसऱ्या फू बाई फूच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणाले, राष्ट्रवादीसोबत गेलो ते बेरजेचं राजकारण आहे. हे बेरजेचं आहे की खरजेचं आहे हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. मग शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेली ते कोणतं राजकारण होतं? त्या बेरजेच्या राजकारणात तुम्ही सत्ता भोगली, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

अजित पवारांना कंठ फुटायचाय

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण किती खोटारडे आहोत हे दाखवून दिलं आहे. काल काय बोललो, आज काय बोललो याचं भान नाही. कोणत्या नशेत आहेत हे? यांना कोणती भांग कोणी पाजली हेच कळत नाही. लोकमान्य टिळक म्हणायचे एक आण्याची भांग प्यायल्यावर खूप कल्पना सूचतात. तसेच हे कोणती भांग प्यायले माहीत नाही. फडणवीस, शिंदे मिंधे खोटं बोलत आहेत. अजित पवारांना अजून कंठ फुटायचा आहे. त्यावर बोलूच. पण मला त्यात पडायचं नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *