• Tue. Jun 24th, 2025

दारू, मटण पार्ट्यासाठी निवडणुका लढवायच्या का? राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारलं

Byjantaadmin

Jul 13, 2023

चिपळूण, 13 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यामध्ये चिपळूण येथे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदाधिकाऱ्यांना पदावर राहता येणार नाही असा सज्जड दम दिला. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या 15 दिवास मी विविध ठिकाणी मेळावे घेणार आहे. त्यामधून माझी भूमिका स्पष्ट करेन. तसंच राज्यात सध्या व्यभिचार सुरूय. वेळ आली तर मी घरी बसेन पण तडजोड करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे

लोकसभेची निवडणूक का लढवायची? दारु, मटण, पार्ट्या यासाठी निवडणुका लढवायच्या का? अशा शब्दात राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फटकारले. राज ठाकरे म्हणाले की, शाखा नव्हे तर नाका उभा करा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवा असं आवाहनही  त्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्रावर प्रेम कमी होऊ देऊ नका, तुमच्यातला राग कमी होऊ देऊ नका, राज्यासाठी लढा, राज्यातल्या नागरिकांवर प्रेम करा. पक्ष नव्हे तर कुटुंब म्हणून काम करा. काम करणार नसाल तर दुसरी माणसं येतील. मनसेचा आमदार, खासदार व्हायला हवा असंही राज ठाकरे म्हणाले.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात राजकीय भूकंप झाला. या परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मला तडजोड करावी लागली तर मी घरी बसेन पण तडजोड करणार नाही. तसंच लोकसभा निवडणूक का लढवावी? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.चिपळूणमध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. चिपळूण नंतर राज ठाकरे खेड आणि दापोलीला जाणार आहेत. पक्ष बांधणीनिमित्त राज ठाकरे यांनी कोकण दौरा आखला आहे. यावेळी चिपळूणमध्ये येताच राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केले गेले. तसंच राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शाखेचं उद्घाटनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *