• Tue. Jun 24th, 2025

विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होणार ! या दोन नावांची चर्चा

Byjantaadmin

Jul 12, 2023

नवी दिल्ली: ‘आगामी काळ देशासाठी विविध दृष्टिकोनांतून महत्त्वाचा असून लोकसभा निवडणुका जवळ येतील तसा भाजपचा आक्रमकपणा वाढत जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपापसातील मतभेद दूर करावेत. गट-तट विसरून काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे. महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षांमध्ये होत असलेल्या घडामोडींचा परिणाम काँग्रेसवर होऊ नये याची दक्षता घ्यावी. परस्परांबद्दलची मते किमान माध्यमांसमोर व्यक्त करू नयेत’, असे काँग्रेस हायकमांडने राज्यातील पक्षनेत्यांना बजावल्याची माहिती मंगळवारी ‘मटा’ला मिळाली आहे.२०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून किमान १५ ते २० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, अशीही सूचना पक्षनेतृत्वाने या नेत्यांना केली. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, खासदार रजनी पाटील, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार आदी सुमारे २५ नेते उपस्थित होते.

Congress meeting

 

लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची एक शक्यता गृहित धरून सज्ज राहायला हवे, असा अंदाज शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपद्धतीवर काही नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावर, हायकमांडने हस्तक्षेप घेताना, ‘सध्याचे दिवस कसे आहेत, याचा विचार करा. आता हे मुद्दे सोडा, नंतर बघू या’, असे सडेतोड मत मांडल्याचे समजते.

‘महाराष्ट्र पिंजून काढा’

राज्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या राजकीय घडामोडी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका, काँग्रेसची सध्याची स्थिती आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा काढावी, त्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढावा अशी सूचना बैठकीत करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील घडामोडींचा परिणाम होऊ देऊ नका, असा सल्लाही देण्यात आला. २०२४च्या लोकसभा निवडणुकीवरही यावेळी चर्चा करण्यात आली. ‘भारत जोडो’ यात्रेचा अनुभव देशात सर्वात चांगला महाराष्ट्रामध्ये आल्याचे आणि आपण निवडणूक कशी जिंकू शकतो हे गांधी यांनी सांगितले’, असे के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

विरोधी नेतेपदावर दावा?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांची निवड करण्याचे बैठकीत ठरले. सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर विधानसभेतील काँग्रेसचे सध्याचे गटनेते बाळासाहेब थोरात किंवा वर्षा गायकवाड यांच्यासारख्या एखाद्या तरुण नेत्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हायकमांड देईल, अशी शक्यता एका ज्येष्ठ नेत्याने वर्तविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *