सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्तीच्या निर्णयाला ‘आयटा’ चा विरोध
मुंबई:(प्रतिनिधी) पवित्र पोर्टल सुरू करून अनेक वर्षापासून नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या डी.एड्. , बी एड्.धारक बेरोजगार शिक्षकांना नियुक्त करण्या ऐवजी चक्क सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा महाराष्ट्र शासनाने अफलातून निर्णय घेतल्यामुळे भावी शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. शासनाच्या या निर्णयाला शिक्षकांची राष्ट्रीय नोंदणीकृत संघटना ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन ‘आयटा’ ने तीव्र विरोध केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यामध्ये शासकीय शाळांमध्ये एकूण ६५१११ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून रिक्त जागांपैकी ५० टक्के जागा भरण्याचे शासनाने घोषित केले असून या बाबतीत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वारंवार आश्वासनही दिले आहेत. त्यानुसार शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२३ चे आयोजन करुन २३ मार्चला सदरील परीक्षेचा निकाल जाहीर केलं. तद्नंतर नवीन शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता ७ जुलै रोजी शासनाने एक परिपत्रक निर्गमित करून निवृत्त शिक्षकांना वीस हजार रुपये मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदरील बातमी ऐकताच पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची चंद्रासारखी वाट पाहणाऱ्या भावी शिक्षकांना जणू धक्काच बसला. अखेर शासनाच्या मनात आहे तरी काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्तीच्या निर्णयावर ‘आयटा’ महाराष्ट्र ने नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना पत्र पाठवून सदरील निर्णय रद्द करून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या माध्यमातून कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्याचे आवाहन केले आहे.