मुंबई, 11 जुलै : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टीका केली. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी कालच प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचे दोन व्हिडिओ आणि आठ मुद्दे टाकत पलटवार केला.
यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे, की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतो, त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल. अशा मानसिकतेतून जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याच्यावर रिएक्शन देणंही योग्य नाही’, असं फडणवीस म्हणाले.दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, तसंच उद्धव ठाकरे यांचा पुतळाही जाळला. नागपूर विमानतळावर लावण्यात आलेले उद्धव ठाकरे यांचे पोस्टरही भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.
या सगळ्या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. ‘त्यात एवढं लागण्यासारखं काय आहे, ज्यांना माझा हा शब्द लागला आहे. तुम्ही जेव्हा एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. तेव्हा कलंक लावत नाही का? माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं, मला थोडं बरं वाटलं, तुमचं मन जागं आहे. निदान जनाची नाहीतर मनाचा तरी आरोप करताना थोडं तरी भान ठेवा, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. तसंच, कलंक ही काय शिवी होती का, माझ्या आजाराबद्दल, ऑपरेशनबद्दल तुम्ही बोलला तेव्हा ते चालतं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.माझ्या झालेल्या ऑपरेशनवरून चेष्टा करतात, माझ्या कंबरेचा पट्टा सुटला, मानेचा पट्टा सुटला, मी असं करत नाही, जे भोगलं ते कुणी भोगू नये, कुणाच्या कुटुंबाबद्दल बोलतात, कुणाच्या आजाराबद्दल बोलतात, एवढ्या खालच्या पातळीला जातात. मग की लोक कलंकच आहे, महाराष्ट्राला कलंकच आहात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.