शिवसेना फुटीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. पहिल्या मंत्रिमंडळात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान, वर्षानंतरही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ जणांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या शिवसेना आणि भाजप आमदारांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली AJIT PAWAR सत्तेत सहभागी होताच शिवसेनेतील आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. सरकारसाठी आवश्यक संख्याबळ असताना पवार यांना का घेतले असा थेट प्रश्न काही आमदारांनी उपस्थित केला. दरम्यान, शिवसेनेप्रमाणे जाहीर नसला तरी भाजपच्या गोटातही काही प्रमाणात नाराजी असल्याची माहिती आहे. आता होणाऱ्या मंत्रिमंडळातील आपल्या काही मंत्र्यांना भाजप डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यांच्याजागी इतर आमदारांना संधी देणार असल्याचेही समजते.
शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच तिसरा मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. या मंत्रिमंडळासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आपली योजना तयार केली आहे. त्यानुसार आताच्या मंत्रिमंडळात अपेक्षीत कामगिरी केले नसलेल्या मंत्र्यांनाBJP थांबवण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी इतर आमदारांना संधी देण्यात येईल. यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी एक आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन अशा चार मंत्र्यांचा समावेश असल्याचे समजते. हा बदल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आपल्या काही आमदारांची यादी भाजपने तयार केली आहे. या मंत्रिमंडळात माधुरी मिसाळ, आशिष शेलार, नितेश राणे आणि संजय कुटे जयकुमार रावल, संभाजी पाटिल निलंगेकर या नावांची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांतच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. यात कुणीची वर्णी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.