राज्यात वर्षातच दुसरा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांनी राज्य सरकारमध्ये दि. २ जुलै रोजी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. याला नऊ दिवस उलटले तरी त्यांना खातेवाटप केले नाही. दरम्यान, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली.आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही तासांतच (२४, ४८ किंवा ७२ तास) मंत्रिमंडळ होणार असल्याचा दावा केला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असलेल्या खात्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अनेक बैठका झाल्या आहेत.
दरम्यान, दि. १० जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत यांच्यात बैठक झाली. तसेच आज मंगळवारीही सकाळी पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी खातेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती आहे. आता अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. या बैठकानंतर मंगळवारी (ता. ११) राजभवनमध्ये लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.एकीकडे राजभवनमध्ये लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमदार भरत गोगावले, बालाजी किणीकर, संजय शिरसाट हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आतापर्यंत मंत्रिपदांची जबाबदारी दिली नसल्याची चर्चा आहे.विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला चार, तर भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी पाच मंत्रिपदे मिळणार आहेत.