शिवसेनेत गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. पक्षातील ४० आमदार फुटले आणि राज्यात सत्तांतर झाले. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांना मिळाले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर आता ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी शिंदे यांचा गट मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. त्यानुसार शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाचे असल्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. ठाकरे गटाच्या या आव्हान याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला जाणार आहे.
दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षांचा खटला घटनापीठासमोर सुरू होता. या खटल्याचा निकाल लागेपर्यंत द्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यास मात्र सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. यावेळी ठाकरे गटाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव आणि धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह दिले.
यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आला. यावेळी आयोगाने मूळ पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आता सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.