• Fri. Jun 27th, 2025

शिंदे गटाप्रमाणे भाजपमध्ये देखील मंत्रीपदावरून नाराजी

Byjantaadmin

Jul 6, 2023

अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटात मंत्रीपदावरून दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची देखील माहिती समोर येत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना भाजपमध्ये देखील सर्व काही आलबेल नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केला आहे. सत्तेची पदं गेल्याने फक्त शिंदे गटातच नाराजी नसून भाजपमध्ये देखील थोडीफार नाराजी आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे अजित पवारांची सत्तेत झालेली एन्ट्री भाजपच्या देखील काही लोकांना पटली नसल्याची आता चर्चा होत आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

काही सत्तेची पदं गेल्यावर आमदारांमध्ये नाराजी असते आणि हे साहजिकच आहे. याला तुम्ही नाराजी किंवा बंडखोरी म्हणू शकत नाही. त्यांनी नाराजी दाखवणे हे सत्य आहे. आता हा प्रकार फक्त एकट्या शिवसेनेत (शिंदे गटात) झाला आहे आणि भाजपमध्ये झाला नाही अशातला भाग नाही. भाजपचे देखील 105 आमदार आहेत. काही अपक्ष त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यात देखील काही थोडीफार चालणारच आहे. मात्र या दोन्ही पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता करू नका असे सांगितले आहे. तर आपण योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेऊ असे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपमध्येही नाराजी?

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे बोलून दाखवले आहेत. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. तर अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक वाढली असावी. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच उघडपणे चर्चा झाली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे.

शिंदे गटाचे दोन आमदार भिडले?

मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या इच्छुक आमदारांमध्ये मोठी खदखद असल्याची चर्चा आहे. तर मंत्री असलेल्या लोकांची मंत्रीपद काढून आता ती आम्हाला देण्याची मागणी सुद्धा काही आमदारांनी केली आहे. अशात मंगळवारी झालेल्या एका बैठकीत मंत्रीपदाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे दोन आमदार भिडले  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरचा दौरा अर्ध्यावर सोडून मुंबई गाठले आणि दोन्ही आमदारांच्या समजूत काढल्याच बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *