राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे.वैचारिक मतभेद असतील.पण मनभेद नव्हते.मी 18 वर्षे विधिमंडळात होतो.अनेकांवर टीका केली, सर्वांशी वैयक्तिक मैत्री होती. पण आता थोडे जास्त झाल्यासारखे वाटते, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आला आहे आणि खरे तर या गोष्टीसाठी नेत्यांपेक्षा मीडियाच जास्त कारणीभूत आहे, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता समस्या आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी, तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. मूळात याला मतदारही जबाबदार आहेत.
जसं आपण मुलीचं लग्न करताना तिच्यासाठी नवरदेव, सासू-सासरे कसे आहेत? घर कसं आहे? हे पाहतो.मग मतं देताना आपण याचा गांभीर्याने विचार का करत नाही. मत देताना मतदार हा माझ्या जातीचा, हा माझ्या भाषेचा असा विचार करुन मतदान केले जाते.पण ज्या दिवशी आम्ही देताना विचारपूर्वक देऊ, आम्ही चुकीच्या माणसाला आमचं मत देणार नाही, हे ज्या दिवशी जनता ठरवेल त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील,” असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नव्हती, त्यावेळी मी BJP महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. परंतु अशी परिस्थिती उद्भवली की, मी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. त्यामुळे मला दिल्लीत जावे लागले. मग दिल्लीत गेल्यानंतर मी महाराष्ट्रात परत न येण्याचा निर्णय घेतला, तसेच, आपली मुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छाच नव्हती, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.