• Sun. Jun 29th, 2025

साहेब, उद्धव ठाकरेंना साथ देऊ! मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी; मनसेप्रमुख म्हणतात…

Byjantaadmin

Jul 3, 2023

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालं असताना आता या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. २०१९ पासून राज्यात नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. त्या घडामोडी आजही सुरू आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार आलं असताना आता ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे.

raj uddhav

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊ, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरेंकडे केली. ‘ठाकरेंनी एकत्र यायला हवं. जनतेची हीच भावना आहे. या गोष्टीचा विचार करा,’ असं मनसेचे नेते राज ठाकरेंना म्हणाले. त्यावर राज यांनी काहीशी सावध भूमिका घेतली. ‘त्यांचं (उद्धव ठाकरे गट) चालू द्या. बैठका होऊ द्या. घडामोडी घडू द्या. आपली एकला चलोची भूमिका आहे. तुम्ही काम करत राहा. पुढे काय होईल ते बघू,’ असं राज ठाकरे त्यांच्या नेत्यांना म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरेंनी पक्ष नेत्यांच्या बैठकीनंतर भाष्य केलं. ‘सध्याच्या घडामोडींशी आपला काही संबंध नाही. अजित पवारांच्या निर्णयाला आपला विरोध आहे असं पवार साहेब म्हणत आहेत. पण दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल असे नेते सरकारमध्ये उगाच सामील होणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही,’ अशा शब्दांत राज यांनी शरद पवारांच्या विधानांबद्दल, भूमिकेविषयी शंका व्यक्त केली.राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीनंतर मनसेचे नेते बांळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यायला हवं. दोन्ही भावांनी सोबत यायला हवं अशी जनतेची इच्छा आहे. मी त्यासाठी प्रयत्न केले होते याची कल्पना सर्वांना आहे. याबद्दल आम्ही राज ठाकरेंशी बोललो. या संदर्भात मी मेळाव्यात बोलेन, असं ते म्हणाले आहेत,’ असं नांदगावकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *