मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळतं. राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट…
IMD मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे, रायगड आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज पडल्यासच घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढचा आठवडाही पावसाचा…
दरम्यान, जून महिन्यामध्ये कोकण विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण विभागात पावसाची उपस्थिती चांगलीच जाणवेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्गात रविवारपासून, तर रत्नागिरीमध्ये सोमवारपासून आणि रायगडमध्ये मंगळवारपासून ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्येही मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.