मुंबई : मुंबई कधीही एवढं घाणेरडं वातावरण नव्हते. पण सध्या नीच राजकारण सुरू आहे. नुसतं फोडाफोडीवर लक्ष दिलं जात आहे. दोन आयपीएस अधिकारी आहेत, ते ते सांगतात की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे. त्या अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग आमच्या हातात आलेले आहे. ते आम्ही योग्य ठिकाणी दाखवणार आहोत, असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबई पालिकेवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढण्यात आला. त्यात मोर्चाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यात मोर्चाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, खोके सरकारच्या भुतांना मुंबई महानगरपालिकेच्या परिसरातून पळवून लावयाचे आहे. आम्ही गेल्या २५ वर्षांत केलेली कामे छातीठोकपणे सांगितली आहेत. पण गेल्या वर्षभरात नुसात भ्रष्टाचार झालेला आहे. खोके सरकारच्या प्रतिनिधींना पालिकेचे दरवाजे उघडले जातात. मात्र, नागरिकांसाठी पालिकेचे दरवाजे कायम बंद असतात. अलिबाबा आणि ४० लोकांचे फोन येतात, त्यांच्या फोनवर आमचा वेळ जातो. जनतेच्या कामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अधिकारी मला फोन करून सांगतात की आदित्यजी, काही करून लवकर निवडणुका लावण्याचे काम करा. मागच्या राज्यपालांकडून कायम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचे अपमान झाले आहेत. कारण भाजपेयी होते. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारसंदर्भात मी विद्यमान राज्यपालांना भेटलो. त्यांच्याकडे मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या लोकांनी एक वर्षात नुसते घोटाळेच घोटाळे केले आहेत. खोके उधळून हे नुसतेच होर्डिंग्ज लावतात. त्यात दोनच फोटो असताता. एक अलिबाबाचा आणि दुसरा डीसीएमचा अर्थात दुसरे मुख्यमंत्री, असेही आदित्य यांनी नमूद केले. मुंबईत कधीही एवढं घाणेरडं वातावरण नव्हतं. आता फक्त नीच राजकारण सुरू आहे. नुसतं फोडाफोडीवर लक्ष दिलं जात आहे. दोन माजी नगरसेवकांनी सांगितलं की दोन आयपीएस ऑफीसर आहेत, ते सांगतात की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे. त्याचं रेकॉर्डिंग आमच्या हातात आलेले आहे. ते मी योग्य ठिकाणी दाखवणार आहे, असा इशाराही आदित्य यांनी दिला.