गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान
वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कारणांमुळे अनेकदा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटूंबातील आई-वडील, पती किंवा पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण दोन जणांसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ही योजना दिनांक 19 एप्रिल 2023 ते आवश्यकतेनुसार प्रथम तीन वर्षे राबविण्यात येणार आहे.
योजनेसाठी कुटूंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एका सदस्यामध्ये आई-वडील, पती किंवा पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषि गणनेनुसार निर्धारीत केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटूंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण दोन जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
सानुग्रह अनुदान योजनेचे स्वरूप
अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास अथवा अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.
नैसर्गिक आपत्ती, अपघातामुळे मृत्यू आल्यास सहाय्य
रस्ता अथवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतू नाशके हाताळताना अथवा अन्य कारणामूळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामूळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात इत्यादी अपघातांचा समावेश असेल. नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीराअंतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नौकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश असणार नाही.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
सातबारा उतारा, मृत्यूचा/अपंगत्वाचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसाचे ओळखपत्र आधारकार्ड किंवा पॅनकार्ड किंवा बँक पासबुक किंवा निवडणूक ओळखपत्र, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीसाठी जन्मदाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा आधरकार्ड अथवा निवडणूक ओळखपत्र व ज्या कागदपत्राच्या आधारे वयाची खात्री होईल, अशी कोणतीही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल किंवा स्थळ पंचानामा किंवा पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल, तसेच अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.
वारसदाराच्या निवडीचे निकष
- अपघातग्रस्ताची पत्नीकिंवा पती
- अपघातग्रस्ताची अविवाहीत मुलगी
- अपघातग्रस्ताची आई
- अपघातग्रस्ताचा मुलगा
- अपघाताग्रस्ताचे वडील
- अपघातग्रस्ताची सून
- अन्य कायदेशीर वारसदार.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर समिती
राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षेतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जेंव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल, तेंव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी अथवा शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालूका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. अधिक माहितीकरीता कृषि विभागाच्या क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.
– संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, लातूर