• Mon. Aug 18th, 2025

मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांची हकालपट्टी करा; भाजपचा सज्जड दम

Byjantaadmin

Jun 11, 2023

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे.

एकूण 19 मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भारतीय जनता पक्षाच्या  श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे. मात्र, समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा सज्जड दम भाजपश्रेष्ठींनी दिला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख शिलेदार अडचणीत सापडणार आहे. बंडाच्या वेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या  मंत्र्यांना  अवघ्या काही महिन्यांतच मंत्रिपद कसं काढून घ्यायचं, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समोर उभा आहे.

राज्यातील मंत्रिमंडळात सध्या 20 मंत्री आहेत. त्यापैकी बहुतांश मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवला आहे. त्याचबरोबर एका मंत्र्याकडे अनेक खाती आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.भाजपने एक अहवाल श्रेष्ठींना पाठवला होता. त्यात एकनाथ शिंदेंच्या पाच मंत्र्यांची प्रतिमा जनतेत खराब असल्याचे सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा स्थान दिले तर भाजपचे नुकसान होईल त्यामुळे या पाच मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, असे अहवालात म्हंटले असल्याची माहिती आहे.
या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
या एकनाथ शिंदेच्या शिलेदारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार असल्याचे चित्र आहे.आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आरोग्य विभागात चांगले काम करू शकले नाही तसेच कृषीमंत्री सत्तार शेतकऱयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. भुमरे अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप आहे. गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांच्या बद्दल जनतेत नाराजी असून अपेक्षेप्रमाणे कामे करत नाहीत असा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, पूजा चव्हाण प्रकरणातील नावामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याचा धोका आहे, असे म्हटले आहे.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. भाजप आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांच्या अंतर्गत काय सुरू आहे? मला नाही माहित.”
माध्यमांशी बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले की, “जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. जरी मंत्री झालो नसलो तरी काम करतोय. पण मंत्री झालो तर आणखी वेगानं काम करेनं.” अशी मिश्किल टीका बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे.

नवीन आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) संधी द्या, अशा सूचना शाह यांनी शिंदे-फडणवीस यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर वाचाळवीरांना मंत्रिमंडळ विस्तारापासून दूर ठेवण्याचे आदेश अमित शाह यांनी दिल्याचे माहिती मिळाली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे हा निर्णय गेल्यामुळे शिंदे सरकार बचावलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा रखडलेला मार्ग मोकळा झाला आहे.

सरकार स्थापन होऊन अकरा महिने झाले तरीही अजूनही रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चना उधाण आलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *