जालना: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना तालुक्यातील सामनगाव येथे घडली आहे. ओमकार कृष्णा पडूळ (६ वर्ष), भागवत कृष्णा पडूळ (९ वर्ष), युवराज भागवत इंगळे (५ वर्ष), भागवत जगन्नाथ इंगळे (वय ३२ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.भागवत जगन्नाथ इंगळे त्यांच्या मालकांच्या दोन मुलांसह स्वत:च्या मुलाला शेतामधील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मुलं शेततळ्यात पोहायला उतरली. थोड्या वेळाने ही मुलं पाण्यात अचानक बुडू लागली. मुलांना वाचवण्यासाठी भागवत शेततळ्यात उतरले. पण त्यांना मुलांना वाचवण्यात अपयश आलं. तिन्ही मुलांसोबत भागवतदेखील शेततळ्यात बुडाले.
शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी बघता बघता गावात पसरली. गावकऱ्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशनमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर शेततळ्यातून चौघांचे मृतदेह काढण्यात आले. चारही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २ सख्खे भाऊ आहेत, तर एक मुलगा आणि त्याचे वडील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.