• Thu. May 1st, 2025

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला, कारण…

Byjantaadmin

Jun 6, 2023

अहमदनगर : मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सन्मान वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे लोकांचे बळी गेल्याने आता राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानातील जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच संभाव्य दुर्घटना आणि टीका टाळण्यासाठी राजकीय पक्षही दक्षता घेऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ जून रोजी अहमदनगरला मेळावा आयोजित केला होता. उन्हाचा त्रास नको म्हणून हा मेळावा सायंकाळी ठेवण्यात आला होता. मात्र आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जागा निश्चित करून त्यावर तयारीही सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे येऊन तयारीची पाहणी केली होती. आढावा बैठकही घेतली होती. मात्र, आज हवामान विभागाचा अंदाज आल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जून २०२३ रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.दरम्यान, मेळावा रद्द करण्यात आला नसून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्थात लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे नगरच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *