यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामानाची माहिती देणारी खासगी संस्था स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये दरवर्षी साधारणत: २२मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्याची सुरूवात कमकुवत असून अंदमान तसेच केरळ किनाऱ्यावरही पाऊस विलंबाने पोहोचणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. केरळच्या किनारपट्टीवर नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होत असतो.
दरवर्षी मान्सून सामान्यपणे १ जूनला केरळ किनारपट्टीवर भारतात दाखल होत असतो.यावर्षी अलनिनो प्रभावामुळे यात काहीसा विलंब होणार आहे. तरी स्कायमेटच्या आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९४ टक्के कोसळणार आहे. तर हवामान विभागानुसार या काळात ८३.५ मिमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के होणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने अद्याप मान्सून कधी सुरू होणार याचा अंदाज जाहीर केलेला नाही. परंतू, एप्रिलमध्ये त्यांनी नैऋत्य मान्सूनच्या काळात उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम भारत, मध्य आणि पूर्वोत्तर भारतामध्ये सामान्य ते सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता.
स्कायमेट संस्थेच्या नुकत्याच वर्तवलेल्या मान्सून अंदाजानुसार उत्तर भारतात १८ मे नंतर गडगडाट व वादळी वारेसुरू होतील. भारतात यावर्षी जूनपर्यंत हवामानातील उष्णता कायम राहील. मान्सूनची सुरुवात कमी आणि विलंबाने होणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. पाऊस विलंबाने दाखल होणार असल्याने खरीप पिंकाची पेरणीही पुढे जाणार आहे. यामुळेशेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.