मुंबई, 12 मे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका केली आहे. याआधीच उपायुक्तपदाचं निलंबन मागे घेतलं होतं. त्यानंतर आरोपातून सुटका केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना मदत केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्ताला निलंबित केले होते. पण, आता शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी कर्तव्यावर वागण्याचा आदेश दिला आहे. याआधी निलंबित पोलीस उपायुक्ताचे निलंबन रद्द केले आहे.
परमबीर सिंग यांची आरोपातून सुटका
महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश रद्द केले आहे आणि ते ऑन-ड्युटी असल्याचे मानले जावे असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. “ऑल इंडिया सर्व्हिसेस (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 8 अंतर्गत श्री. परम बीर सिंग, IPS (निवृत्त) विरुद्ध दिनांक 02/12/2021 रोजी जारी केलेले आरोपपत्र मागे घेतले जात आहे आणि हे प्रकरण बंद केले जात आहे.” सरकारचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी जारी केलेला आदेश वाचला.
त्यांच्या निलंबनाशी संबंधित अन्य आदेशात म्हटलं आहे की, “अखिल भारतीय सेवा नियम 1958 च्या तरतुदीनुसार, परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे आणि 02/12/2021 ते 30/06/2022 पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी हा सर्व उद्देशांसाठी कर्तव्यावर खर्च केलेला कालावधी मानला जाईल.”
परमबीर सिंग यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीच्या अनेक खटल्यांचा सामना करावा लागला होता आणि कारमायकल रोडवर बॉम्ब प्रकरणाच्या चुकीच्या हाताळणीमुळे त्यांना मुंबई पोलीस प्रमुख पदावरून हटवण्यात आले होते. तसंच, सिंग यांच्याविरुद्धच्या या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने 5 स्वतंत्र एफआयआर नोंदवले होते आणि यापूर्वी मुंबई पोलिसांनी हे गुन्हे नोंदवले होते.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंग यांनी 200 दिवसांहून अधिक दिवस गृह विभागाला न कळवता परस्पर सुट्टी घेतली होती. त्या संदर्भातही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. आता निलंबन करण्यात आलं होतं. परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.
ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर
परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर 234 दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीयेत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर तत्कालीन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेशही दिले होते.