बीड जिल्ह्यातील आज निकाल लागलेल्या सहापैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) झेंडा फडकला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना याचे श्रेय असल्याचे धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. हा निकाल सरकारच्या विरोधात आहे, त्यामुळे सरकार निवडणुका का घेत नाही? याचे गुपत आजच्या निकालात दडले आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकांमधील यश हे महाविकास आघाडीसाठी मोठे यश समजले जाते. यावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा भाऊ dhanjay munde यांनी बहिण पंकजा मुंडे यांना मात दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र पकंजा यांच्यावर थेट टीका करणे टाळले.
धनंजय मुंडे म्हणाले, संपूर्ण बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. सहा पैकी पाच बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत.मोठ्या फरकाने आमचा विजय झाला आहे. याबद्दल मी बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे आभार मानतो. अंबाजोगाई, बीड, परळी, गेवराई, आणि वडवणीत आमचे वर्चस्व कायम राहिले. केज बाजार समिती वगळता आमचा जिल्ह्यात झालेला हा विजय ऐतिहासिक आहे.विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय होतोय, हे आता विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे.
सरकार निवडणुका का घेत नाही याचे गुपित या आजच्या निकालात दडले आहे, याचा पुनरुच्चार देखील मुंडे यांनी केला. नगरपरिषद , जिल्हा परिषद निवडणुका झाल्या पाहिजेत. राज्यातील सत्तांतर नंतरची ही पहिलीच निवडणूक आणि त्यात संपुर्ण राज्यात महाविकास आघाडीला घवघवित यश मिळाले, याबद्दल समाधान आणि आनंद वाटत असल्याचेही मुंडे म्हणाले.