मुंबई: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी पालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सध्या कोर्टरुममध्ये अतिश्य रंजक युक्तिवाद पाहायला मिळत आहे. उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करणार की नाही, असा सवाल विचारला होता. त्यावेळी पालिकेतर्फे युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिलेले वकील अनिल साखरे यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. ऋतुजा लटके यांच्याविरोधात लाच घेणे आणि भ्रष्टाचाराची एक तक्रार १२ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने मंजूर करण्यास नकार दिला आहे. हा ठाकरे गट आणि ऋतुजा लटके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे ऋतुला लटके यांच्या अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याच्या शक्यता वेगाने मावळत चालल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. सध्याचा युक्तिवादाचे एकूण स्वरुप पाहता पालिका कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा कायदेशीव वाद किमान आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋतुजा लटके उद्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात की नाही, याबाबत साशंकता आहे