• Wed. Jun 18th, 2025

ED, CBI बाजूला करा, मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Byjantaadmin

Apr 5, 2023

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही मी फडतूस नव्हे तर काडतूस, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर ईडी व सीबीआय हेच तुमचे खरे काडतूस आहेत. एकदा त्यांना बाजूला करा मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरेंनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. त्याला आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

फडतूस हा शब्द सौम्यच

संजय राऊत म्हणाले, उद्धव सेनेच्या रोशनी शिंदे या पदाधिकाऱ्यावर शिंदेंच्या टोळीतील गुंडांनी हल्ला केला. ती मातृत्वाचे उपचार घेत असूनही तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या. तिच्यावर हल्ला करण्याचे कारणच काय होते? याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा सरकारलाच सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले होते.

पुढे संजय राऊत म्हणाले, या सर्व प्रकरणावर टीका करताना खरे तर उद्धव ठाकरेंनी सौम्य शब्द वापरला. फडतूसचा डिक्शनरीत अर्थ पाहिला तर तो मिनिंगलेस, बिनकामाचा असा आहे. त्यामुळे तो शब्द एवढा आत घुसण्याचे कारण नव्हते. कदाचित नागपुरात फडतूसचा अर्थ वेगळा असेल. फडणवीस म्हणतात मी नागपुरातील आहे. मला याहून खालच्या पातळीवर बोलता येते. पण, नागपूरही महाराष्ट्रातच आहे ना. तिथली सर्व भाषा आम्हाला कळते.

महाराष्ट्राला फडणवीसांची अडचण

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणतात मी फडतूस नव्हे तर काडतूस आहे. खरे तर सीबीआय, ईडी हेच यांचे काडतूस आहे. ईडी, सीबीआयमुळेच यांना चरबी चढलील आहे. ते एकदा बाजुला करा मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो.

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, हीच महाराष्ट्राची अडचण झाली आहे. तुमच्या डोळ्यांसमोर म्हणजेच मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्या केल्या. तरीही फडणवीसांना याविषयी कल्पना नाही. हीच का तुमची मर्दानगी. याला कोणता कारभार म्हणायचा. आम्ही तसेही फाटके आहोत. तुमच्या ईडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही. मात्र, असे राजकारण करुन भाजपनेच महाराष्ट्राची परंपरा मोडून काढली आहे.

बावनकुळेंचे तिकीट का कापले होते?

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरेंना धमकीच दिली आहे. भाजप नेत्यांविषयी यापुढे खालच्या भाषेत टीका केल्यास ठाकरेंना यापुढे घराबाहेरही पडू देणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आह. त्यावर संजय राऊत म्हणाले, बावनकुळे आहेत कोण? 2019च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळेंचे तिकीट का कापले होते?, हेच एकदा त्यांना विचारा. दिल्लीतील भाजप नेत्यांनी तेव्हा त्यांना घराबाहेरही पडू दिले नव्हते. त्यांच्या पत्नीलाही तेव्हा तिकीट दिले नव्हते.

बावनकुळेंचा वीज खात्यात मोठा भ्रष्टाचार

संजय राऊत म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज खात्यात मोठा भ्रष्टाचार केला होता. भ्रष्टाचाराचे हे प्रकरण दिल्लीत गेल्यामुळेच त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. आम्ही मर्यादा सांभाळलीये. त्यामुळे तुम्ही शिवसेनेला धमक्या देऊ नका. स्वत:लाच सांभाळा. ईडी, सीबीआयमुळेच तुमची जीभ चुरुचुरु चालत आहे. तुमच्यासारखे फुसके बार खूप पाहिले आहेत. ईडी, सीबीआयमुळे हे पोपट आता मिठू-मिठू बोलू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *