काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे शंकर अण्णा धोंडगेंनी राष्ट्रवादीच्या किसान प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. यामुळे काँग्रेसला विदर्भात तर राष्ट्रवादीला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 3 दिवसांपूर्वी राज्यात राजकीय भुकंप होणार आहे. या भूकंपामुळे भलेभले हादरून जाणार आहेत असे वक्तव्य केले होते. यानंतर आता काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अनंतराव देशमुख काँग्रेसचे हे राजीव गांधी अन् राजेश पायलटांसह विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते अशी त्यांची ओळख, विदर्भातील मास लीडर म्हणून देखील ते लोकांना परिचित आहेत. देशमुख यांच्या पाठीशी मोठा जनाधार असून स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामीण राजकारणावर त्यांची घट्ट पकड असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे अनंतराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री तथा वाशिम अकोला लोकसभेचे खासदार राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनंतराव देशमुख काँग्रेसमध्ये सक्रिय नाहीत.
2019 मध्ये अमित झनककडून पराभव
अनंतराव देशमुखांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमित झनक यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यात अमित झनक यांना 69,875 तर अनंतराव देशमुख यांना 67,734मते मिळाली होती. अवघ्या 2141 मतांनी झनक यांचा विजय झाला होता. तर 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुभाष झनक यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. यात सुभाष झनक यांना 51234 तर अनंतराव देशमुख यांना 48194 मते मिळाली होती. राजीव गांधी यांचे ते अतिशय जवळचे सहकारी होते. ज्या पद्धतीने राजीव सातव राहुल गांधी सोबत होते त्याच पद्धतीने अनंतराव देशमुख हे राजीव गांधी यांच्यासोबत राहायचे. मात्र त्यानंतर वाशिम काँग्रेसमध्ये ते सक्रिय असल्याचे दिसून आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी अनेक शेतकरी आंदोलनं केली आहेत. ते शेतकरी चळवळीतील नेते आहेत. त्यांनी 2009 मध्ये कंधार लोहा मतदारसंघाचे नेतृ़त्व केले आहे. श्यावेळी त्यांना 81539 मते मिळाली होती तर प्रतापराव चिखलीकर यांना 72175 मते मिळाली होती. 2004 मध्ये प्रतापराव चिखलीकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले, तर 2014 मध्येही त्यांचाच या मतदारसंघात विजय झाला होता.