देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दोन शब्दांत वर्णन करायचे त्याचे ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प, असे वर्णन करता येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
सरकारकडून अपेक्षा होती
विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, मविआ काळात आम्ही दोन ते तीन वेळा अर्थसंकल्प मांडला. तेव्हा कोरोनाचे संकट होते. तसेच, केंद्र सरकारही आमच्या बाजूने नव्हते. त्यामुळे कधीही मागणी केली तरी आमची 25 हजार कोटींहून अधिक जीएसटी थकबाकी असायची. आता केंद्रातील महाशक्तीचा पाठिंबा असलेले सरकार राज्यात आहे. त्यामुळे सरकार चांगला अर्थसंकल्प मांडेल, चांगला कारभार करेल, अशी अपेक्षा होती.
सर्व समाजघटकांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले, मात्र राज्य सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरत आहे. मी आजच एक, दोन अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो. अद्याप त्यांच्या बांधावर पचंनामा करण्यासाठी एकही जण गेला नाही. याऊलट या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाजघटकांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मविआच्याच योजनांचे नामांतर
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात सध्या अवकाळी आहे. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा गडगडाट आहे. प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. गरजेल तो बरसेल काय? अर्थसंकल्पात आमच्याच योजना नामांतर करुन पुढे आणल्या आहेत. उदाहरणार्थ मुंबईत आम्ही राबवत असलेली आपला दवाखाना ही योजना आता राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख
उद्धव ठाकरे म्हणाले, अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या त्यांची अंमलबजावणी कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार, याबाबत अर्थसंकल्पात कोणतीच वाच्यता नाही. आज अर्थसंकल्पात वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला गेला. मात्र, मोदींनी सत्तेत येताच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. त्याला आता 8, 10 वर्षे उलटून गेले आहेत. तरीही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट सोडा किमान हमीभावही मिळत नाही, अशी स्थिती आहे.