शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला जे घवघवीत यश मिळालं, त्यामध्ये भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. ते कसे, हे निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे फडणवीसांनी असंच बोलत राहावं, म्हणजे आम्हाला असेच विजय मिळत राहतील, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा काल सायंकाळी महादुला येथे पार पडला. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, जुनी पेंशन योजना लागू करण्याचा विषय सध्या राज्यात पेटलेला आहे. देशात ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे राज्य आहे, तेथे आम्ही जुनी पेंशन योजना लागू केलेली आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेंशन योजना कॉंग्रेसने लागू केली आहे.
यासंदर्भात आम्ही फक्त बोललोच नाही, तर करून दाखविले. nagpur शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सुधाकर अडबाले यांनी जुनी पेंशन योजना लागू करण्याची भूमिका घेतली. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जुनी पेंशन योजना लागू करू शकणार नाही. त्याचा फायदा आम्हाला निवडणुकीत झाला.
मतदारांनीही विचार केला की, फडणवीस तर म्हणत आहेत की, जुनी पेंशन देणार नाही आणि कॉंग्रेसने त्यांचे राज्य असलेल्या ठिकाणी जुनी पेंशन योजना दिली. त्यामुळे त्यांनी विचार केला की, आता कॉंग्रेसच्याच उमेदवारांना निवडून आणायचे, असे चव्हाण म्हणाले.
Devendra fadnvis त्या विधानाचा आम्हाला चांगलाच फायदा झाला. भविष्यातही त्यांनी अशीच विधाने करीत राहावे आणि आमचे उमेदवार पुढील प्रत्येक निवडणुकीत विजयी होत राहावे. खरं तर फडणवीस बोललेले वाक्य रेकॉर्डवर आहे. आमच्या या विजयात फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. सुधाकर अडबाले यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्यांनी जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी लावून धरली आहे. आगामी काळात ती पूर्ण होईल, असा विश्वास ashok chavahn यांनी व्यक्त केला.