किमान तापमानात घट झाल्याने महाराष्ट्र गारठला आहे. आजही उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडी कायम आहे. पुढील 3 दिवस राज्यासह मध्य भारतातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर पश्चिम भारतात तर 48 तासांनंतर किमान तापमानात आणखी 2 ते 3 अशांनी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4-5 दिवसांनंतर किमान तापमानात साधारण 2 ते 4 अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता पुणे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद, धुळ्यात पारा 10 अंशांच्या खाली
राज्यातील निफाड येथे नीचांकी तापमान 8.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथे पारा 10 अंशांच्या खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी हुडहुडी भरली आहे. राज्याच्या उर्वरित भागातही किमान तापमानात घट झाल्याने गारठा कायम आहे. पुढील 3 दिवस या वातावरण बदल होण्याची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
प्रमुख शहरांतील कमाल व किमान तापमान
पुणे 32.3 (10.9), औरंगाबाद 31.4 (9.2), नांदेड (12.4), परभणी 31.6 (11), जळगाव 33.4 (10), धुळे 30 (8.7), कोल्हापूर 31.5 (18.5), महाबळेश्वर 29.7 (15.6), नाशिक 31.2 (11.6), निफाड 31 (8.1), सांगली 33.2 (16.1), सातारा 32.4 (14.7), सोलापूर 35 (16), अकोला 33.9 (11.9), अमरावती 32.6 (12.4), बुलडाणा 30 (13), ब्रह्मपुरी 33 (12.6), नागपूर 31.3 (11)
वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला
दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी दिवसा कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे गेले असले तरी रात्रीचे किमान तापमान गेल्या चार दिवसांपासून 10 अंशांच्या खाली आहे. किमान तापमान कमी असल्याने रात्रीच्या वेळी गारठा कायम आहे. काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोल्याच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये समस्या जास्त प्रमाणात आहे