नागपूर, – भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपूर्ण असून महिलांनी सहभाग दिल्याने देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला.
येथे १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आवारात हा सोहळा पार पडला. येत्या ७ जानेवारीपर्यंत येथे विविध विज्ञानविषयक चर्चासत्रे व सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
वैज्ञानिक संशोधनाला देशसेवेच्या भावनेची जोड आवश्यक
आपल्या संबोधनात प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात भारत कोठे असेल याचे अनुमान करण्यात विज्ञानाची भूमिका मोलाची आहे. ज्यावेळी वैज्ञानिक संशोधनाला देशसेवेच्या भावनेची जोड मिळते त्यावेळी मिळणारे परिणाम अभूतपूर्व असतात. निरीक्षण हा विज्ञानाचा पाया आहे. निरीक्षणाच्या जोडीला केले जाणारे प्रयोग त्यातून मिळणारी तथ्ये आणि त्यांचे विश्लेषण हे महत्त्वाचे असते. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करणे हे वैज्ञानिकांसाठी महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने सध्याच्या काळात भारताकडे मोठ्या प्रमाणावर डाटा आणि तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. या नव्या क्षेत्रात भरारी घेण्यास भरपूर वाव आहे. पृथक्करण केलेल्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करणे आणि ज्ञानातून विज्ञान संशोधन करणे हे परस्परांना मदत करणारे घटक ठरु शकतात.
वैज्ञानिक दृष्टीला चालना दिल्याचे चांगले परिणाम
प्रधानमंत्री म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टीला चालना दिल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आपण सध्या विकसित देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन सूचित ४० व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. पीएचडी करण्याबाबतही आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. स्टार्टअप देशांच्या इकोसिस्टिम सूचित आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत.
महिलांच्या सहभागामुळे विज्ञान तंत्रज्ञानाला गती
मध्यवर्ती संकल्पनेबाबत बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की, विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरण हे शब्द जोडले आहेत. हे खरेच आहे की, महिलांच्या सहभागामुळे विज्ञान तंत्रज्ञानाला नवी गती प्राप्त झाली आहे. महिलांचा सर्वच क्षेत्रातील सहभाग हा वाखाणण्यासारखा आहे. येत्या जी २० परिषदेचे यजमानपद भूषवित असतानाही आपण महिलांच्या पुढाकारातून विकास हे सूत्र ठरविले आहे. महिलांनी विज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात असाधारण कार्य केले आहे. इतकेच नव्हे तर स्टार्टअप आणि मुद्रा योजनेसारख्या लहान व्यवसायांना चालना देणाऱ्या योजनेत महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे. ज्यावेळी महिलांना चालना मिळत असते त्यावेळी तो समाजही प्रगत होत असतो.
मानवाचे आयुष्य सुखद करणे हेच विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट
या काँग्रेसच्या निमित्ताने जमलेल्या वैज्ञानिकांना आवाहन करताना प्रधानमंत्री म्हणाले की, मानवाचे आयुष्य सुखद करणे, सर्व गरजांची पूर्तता करणे हे आपल्या ज्ञानाचे उद्दिष्ट असायला हवे. प्रयोगशाळा ते जमीन, संशोधन ते वास्तविक जीवन, प्रयोग ते अनुभूती हा असा हा ज्ञानाचा प्रवास असायला हवा. ही बाब युवकांना अधिक प्रोत्साहित करते. युवकांना या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी संस्थागत रचनेच्या मजबुतीकरणाची आवश्यकता आहे. टॅलेंट हंट आणि हॅकेथॉनच्या आयोजनातून आपण विज्ञानवादी विचार करणाऱ्या युवकांच्या प्रतिभेचा शोध घेऊ शकतो. अशाच संस्थागत रचना मजबुतीकरणातून देशाने क्रीडा क्षेत्रात प्रगती सुरु केली आहे.यात गुरु शिष्य या प्राचीन भारतीय परंपरेचेही योगदान महत्त्वाचे होते. त्याच पद्धतीने विज्ञानाच्या क्षेत्रातही कार्य करणे शक्य होईल व यश संपादन करता येईल.