मुंबई:-जगभरात कोरोना वाढत आहे. चीनसह अमेरिका, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले असून, केंद्राकडून राज्यांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनेबाबत एक पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाले असून, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाताळची सुटी व थर्टीफस्टमुळे रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रवासात तोंडाला मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावे, प्रवासात सॅनिटायजरचा वापर करावा अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. थर्टीफस्ट आणि नाताळमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं प्रवाशांच्या प्रतिक्षा यादीत मोठी वाढ झाली आहे.
प्रवासी सिझनमुळे सध्या पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. इतर गाड्यांना रेखील आरक्षणासाठी मोठी प्रतिक्षा यादी आहे. परिणामी अनेक जण वेटिंगचे तिकीट काढून खाली बसून प्रवास करणे पसंत करत आहेत. जनरल डब्यांमध्ये तर पाय ठेवायला देखील जागा नाही. आरक्षितसह जनरल डब्यांमध्ये बहुतांश प्रवासी मास्क लावणे टाळतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांनी मास्क वापरावे. प्रवासात सुरक्षित अंतराचे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत.