शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर योजने अंतर्गत जिल्हा बँकेचे ७९ हजार शेतकरी पात्र
जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांची माहिती
लातूर :-राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत दुसऱ्या यादीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार शेतकरी पात्र झाले असून जिल्ह्यातील एकूण ८३ हजार शेतकऱ्यांपैकी ७९ हजार शेतकरी हे केवळ जिल्हा बँकेचे सभासद आहेत.
प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या निकषानुसार सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित पीककर्जाची मुदतीत परतफेड करणारे शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. पात्र सभासदांना परतफेड केलेल्या मुदला इतपत परंतु जास्तीत रु. ५० हजार पर्यंत लाभ देण्यात येत आहे. लाभाच्या रकमा संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खाती जमा होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी बोलताना दिली आहे.
आधार प्रमाणीकरण करून घ्यावे
शासनाच्या पहिल्या यादीत जिल्हा बँकेचे ३९ हजार शेतकरी पात्र झालेले होते त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ३७ हजार ४०० शेतकऱयांच्या बचत खाती रू. ११८ कोटी ७० लाख रक्कम जमा झालेली आहे.
दुसऱ्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड,बचत खाते पासबुक व यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र, महा ई-सेवा केंद्र व जवळच्या बँक शाखेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे