हजारो मराठा बांधव मुंबई मोर्चात सहभागी होणार निलंगा तालुक्यातील सकल मराठा समाजाचा निर्धार
निलंगा : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी दि.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाज जाणार असा निर्धार शासकीय विश्रामगृह निलंगा येथील झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील दि. 27ऑगस्ट रोजी अंतरवाली येथून आंदोलनाला निघणार आहेत 28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्यावर दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने मार्गस्त होणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र लढा उभा केला आहे. राज्य सरकारच्या वतीने गेल्यावर्षी झालेल्या आंदोलनात वाशी येथे सगे सोयरे चा अध्यादेश पारीत करुन आरक्षण देऊ असा शब्द दिला होता.महाराष्ट्र सरकारने तो शब्द न पाळल्यामुळे दि. 29ऑगस्ट रोजी ‘मुंबई ‘मध्ये आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केलेला आहे. मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निलंगा तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असा निर्धार सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आला आहे. या बैठकीसाठी निलंगा तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
