मठ म्हणजे ज्ञान दासोह करण्याचे संस्कार केंद्र-कोरणेश्वर महास्वामीजी
निलंगा:- देशात हजारो मठ असून मठ म्हणजे धन दौलत गोळा करणे नव्हे तर लोकांमध्ये जनजागृती वनितीमूल्यांची रुजवण करण्यासाठी अन्न दासोहासोबत ज्ञान दासोह करणारे संस्कार केंद्र असल्याचे प्रतिपादन लिंगायत आंदोलनाचे मार्गदर्शक तथा उस्तुरी व आळंद मठाचे मठाधिपती मनिप्र कोरणेश्वर महास्वामीजी यांनी केले.निलंगा येथे संगन बसव विरक्त मठ निलंगा येथे चालविण्यात येणाऱ्या महात्मा बसेश्वर शिव सांप्रदायिक गुरुकुलाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगन बसव मठाचे मठाधिपती संगन बसव महास्वामीजी होते.
यावेळी व्यासपीठावर संगन बसव विरक्त मठाचे नूतन अध्यक्ष अमोल आर्य , माजी उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मनोज कोळळे, शिवाजी रेशमे गुरुजी, विनोद आर्य, काशिनाथप्पा आग्रे, शिवहार वाडकर लातूर, उध्दव महाराज हैबतपूरे,शिवराज पाटील उदगीर, धनराज गोंड जळकोट, आदी मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना कोरणेश्वर महास्वामीजी म्हणाले, गुरु,लिंग, जंगम, हे जात धर्म नव्हे तर एक तत्व व विचार प्रणाली आहे. देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत लिंगायत मठाचे योगदान फार मोठे आहे. लिंगायत मठाच्या वतीने देशभरात चालविण्यात येणाऱ्या विविध गुरुकुला मधून हजारो विद्यार्थ्यांवर धार्मिक नितीमूल्यांची व सामाजिक समतेच्या मूल्यांची रुजवण केली जाते.आजपर्यंतच्या इतिहासात राम, कृष्ण यांनी सुद्धा गुरुच्या सानिध्यात आश्रमात राहून शिक्षण घेतले आहे. आजच्या मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी गुरूकुल शिक्षण पद्धतीची अत्यंत गरज आहे. समाज सेवा, राष्ट्र सेवा, व कायक हिच खरी गुरु लिंग जंगमाची सेवा आहे. जाती वर्ग वर्ण विरहित समाज निर्माण करण्यासाठी आजपर्यंत लिंगायत विरक्त मठांनी खुप मोलाचे योगदान दिले आहे. अन्न दासोह व ज्ञान दासोह हे या मठाचे मुख्य कार्य आहे. मठ म्हणजे गुरुकुल होय . ज्ञानदानासाठीच मठाची निर्मीती शरणानी केली आहे. त्या तत्वाचे पालन करणारा मठ म्हणजे निलंगा येथील श्री संगनबसव विरक्त मठ आहे असे प्रतिपादन उस्तुरी व आळंद विरक्त मठाचे मठाधिपती कोरणेश्वर महास्वामीजी यानी व्यक्त केली . यावेळी विनोद आर्य, रवी फुलारी व श्रीशैल बिराजदार, शिवहार वाडकर यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संगन बसव महास्वामीजी यांनी गुरुकुलाच्या मागील वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडून पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.राजुप्पा महाजन, सिद्रामप्पा सोरडे, विरभद्र आग्रे,बसराज राजुरे , प्रकाश पटणे, नागनाथ सोरडे, अशोकआप्पा कापसे, सोमनाथ आग्रे, फताटे आप्पा, सातलिंग कलशेट्टी यांच्या सह समाजबांधव व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भजन गायन करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इंजिनिअर एम के कस्तुरे यांनी केले.
