स्व.विलासराव देशमुख मार्गाचे उदघाटन करण्याची संधी मतदार मलाच देतील-डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर/प्रतिनिधी :आपल्या वडिलांच्या नावे असणाऱ्या स्व.विलासराव देशमुख मार्गाच्या नूतनीकरणाचे काम स्थानिक आमदार अनेक वर्ष पूर्ण करू शकले नाहीत.तरी देखील लातूरची जनता त्यांना सहन करते.आपण एवढे सहनशील कसे ? असा सवाल उपस्थित करत या मार्गाचे नूतनीकरण करुन उदघाटन करण्याची संधी लातुरची जनता मलाच देईल, असा विश्वास भाजपा महायुतीच्या लातूर शहर मतदार संघातील उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.
लातूर शहरातील बार्शी रस्त्यावरील संविधान चौकात बुधवारी रात्री आयोजित भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. संविधान सभेत डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर बोलत होत्या.
व्यासपीठावर भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे,ॲड.दिग्विजय काथवटे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाने,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील,रिपाइंचे सोनकांबळे,बोमणे,शोभाताई पाटील,गणेश गोमचाळे,नवनाथ आल्टे,माजी नगरसेविका गितेताई यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रशांत पाटील यांनी आ.देशमुख हे मुस्लिम,दलित द्वेषी असल्याचा आरोप केला.देशमुखांनी संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध का केला ? असा सवाल करून येत्या २० नोव्हेंबरला कमळाला मतदान करून विद्यमान आमदारांना घरी पाठवावे,असे मतदारांना आवाहन केले.
आपली मुले शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत त्यांचे भवितव्य सुरक्षित होणार नाही.महिला - मुलींच्या सुरक्षिततेसाठी,लातूर शहर भयमुक्त करण्यासाठी डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन सचिन दाने यांनी केले.
शैलेश गोजमगुंडे यांनी बोलताना डॉ.अर्चनाताई पाटील आमदार झाल्यावर लातूर शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले.शहरात मागच्या १५ वर्षात स्वच्छतागृह नव्हते.स्वच्छतागृहाची व्यवस्था आम्हीच केली.या संविधान चौकाचे नामकरणही भाजपनेच केल्याचे सांगितले.आपल्या आमदारांना त्यांनी केलेल्या कामाचा हिशोब विचारलेलेही आवडत नाही.ही बाब योग्य नसून आता विस्कळीत झालेले लातूर शहर सुधारण्यासाठी देवघरची लक्ष्मी आपल्या दारात आली आहे.त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहन केले.
या सभेस परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सभेला महायुतीचे कार्यकर्ते - पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
