मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड तर लातूरसाठी सोयाबीन केंद्र उभारणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला शब्द, विक्रमी मताधिक्क्याने धिरज देशमुख यांना निवडून देण्याचे केले आवाहन
लातूर / प्रतिनिधी
आदरणीय विलासराव देशमुख हे माझे राजकीय गुरु होते. लातूरच्या ग्रामीण भागातील शेती बारा महिने ओलिताखाली असावी, हे स्वप्न आदरणीय विलासराव देशमुख यांचे होते. वॉटरग्रीडच्या माध्यमातून या भागात बारमाही पाण्याची व्यवस्था करण्याबरोबर इथल्या माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा यासाठी लातूरमध्ये सोयाबीन केंद्र सुरु करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
लातूर ग्रामीणचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी रेणापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूर शहर मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अमित विलासराव देशमुख, धिरज विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार वझाहत मिर्झा, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, यशवंतराव पाटील, श्रीशैल उटगे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, आशा भिसे, रेखा कदम, बालाजी कदम, परमेश्वर सुर्यवंशी, सुरेश लहाने, मल्लिकार्जुन हलकुडे, राष्ट्रवादीचे संजय इगे, पूजातई इगे, शिवसेनेचे रघुवीर पाटील, हरिश्चंद्र लहाने, सचिन मोटेगावकर, पद्म पाटील, प्रदीप राठोड, गजेंद्र चव्हाण, हणमंतराव पवार, संजय इगे, सय्यद मुसा, संतोष शिंदे, योगेश देशमुख, जयसिंग जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले यांनी धिरज देशमुख यांच्या विधिमंडळातील कामगिरीचे कौतुक केले. नवखे आमदार असतानाही धिरज देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
नाना पटोले पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंची जोडी या भागातील लोकांची काळजी घ्यायची. त्यांनी मांजरा व रेणा नदीमध्ये बॅरेजस टाकून पावसाळ्यात आलेले पाणी रोखले. त्यांना हा भाग बारमाही ओलिताखाली आणायचा होता. पण देवेंद्र फडणवीस यांची वॉटरग्रीडसाठी कधीच इच्छाशक्ती नव्हती. पण लातूरकरांना मी विश्वास देतो की, विलासराव देशमुख यांचे अधुरे राहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करु. या भागामध्ये वॉटरग्रीडच्या माध्यमातून इथे बारमाही पाणी देऊ, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
देवेंद्र फडणवीस हे फक्त मोठमोठ्या योजनांची घोषणा करतात. मेगा भरती म्हणायचं आणि दुसरीकडे पेपर लीक करुन बेरोजगार युवकांची फसवणूक करायची. हेच काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले, असा आरोप त्यांनी केला. महायुतीचे हे महाभ्रष्ट सरकार मेंदू नसलेले सरकार आहे. कसलाही विचार नसलेले हे सरकार महाराष्ट्र गुजरातला कसे विकता येईल हाच विचार करताना दिसते. महागाई प्रचंड वाढलेली आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या जाहिरातबाज सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर तब्बल ६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे तुमच्या, माझ्या खिशातून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी रमेश कराड यांच्या अकार्यक्षमतेवर टीका करताना त्यांच्या विधिमंडळातील सहभागावरही निशाणा साधला. विधानपरिषदेच्या उपसभापती पण त्यांना ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर धिरज देशमुख यांच्यासारख्या कार्यक्षम उमेदवाराला यावेळी दीड लाखाचे मताधिक्य विजयी करण्याचे आवाहन नाना पटोले यांनी केले.
भाजपला आरक्षण संपवायचे आहे
भाजप सरकार आरक्षण व्यवस्थाच संपवण्याचा घाट घालत आहे. यासाठी त्यांनी बाळकृष्ण आयोग नेमला आहे. त्यानुसार एस-एसटी प्रवर्गातील ज्यांनी ज्यांनी धर्म परिवर्तन केले आहे. त्यांना एसची आरक्षण लागू न करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तशीच अवस्था एसटीची आहे. यांना मनुस्मृती लागू करायची असल्याची टीकाही पटोले यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आरक्षण देण्याचा विषय राहिला बाजूला यांनी जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे मनस्मृती लागू न होण्यासाठी झाली नाही पाहिजे लागणार आहे. त्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे मतही पटोले यांनी यावेळी व्यक्त केले.
महायुतीच्या भ्रष्टाचाराचे लोण गावापर्यंत आले- अमित देशमुख
भाजपने दलित नेते सुधाकर शृंगारे यांच्यावर केला. त्या अन्याय, त्रासाला कंटाळून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची शक्ती वाढली असल्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले. ते म्हणाले, महायुतीच्या भ्रष्टाचाराचे लोण गावापर्यंत आले आहे. सरपंचाला कमिशन दिल्याशिवाय निधी मिळत नाही, हे सांगताना त्यांनी सध्या किती लाच घेतली जाते याचे दरपत्रकच वाचून दाखवले. अशा महायुतीला आपण मतदान करणार का असा सवाल त्यांनी मतदारांना केला. या महायुती सरकारने जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली. गुण्यागोविंदाने नांदत असणारी गावे ही विभागली गेली आहेत. शाळेतल्या मुलांचेही गट पडलेले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रद्रोही भाजपला रोखायचे आहे- धिरज देशमुख
केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात दिलेली आश्वासने ही खोटी आणि फसवी होती. या फसव्या भाजप सरकारचा मुखवटा फाडून धडा शिकवण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत केले आहे. त्याचप्रमाणे यापुढे देखील भाजपचा जो देशाचे विभाजन करण्याचा विचार आहे. देश विकण्याचा आणि दलितांवर अन्याय करण्याचा त्यांचा विचार आहे. तोच विचार या विधानसभा निवडणुकीत थांबवायचा असल्याचेही मत धिरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात वारं होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात वादळ आले आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. विरोधक आम्हाला काँग्रेसने काय केले हे विचारत आहेत. मात्र भाजपाकडून त्यांच्या मित्रांना जे जे आज विकले जात आहेत. ते काँग्रेसने केले असल्याचे उत्तर देत धीरज देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी निवडणूक लढायचे आहे. राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. शेतकऱ्यांचे हक्काचे उद्योजक धनदांडग्याच्या खिशात जात आहे. हे आपल्याला थांबवायचे आहे. या महाराष्ट्रद्रोही भाजपला रोखण्यासाठीच आम्ही २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून महाराष्ट्राला पर्याय दिला. याच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जनतेने विजयाचा कौल देत भाजपाचा बुरखा फाडला असल्याचे मत व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातच रेणापूर शहरात पाणीपुरवठा योजना राबवली आहे. त्याच प्रमाणे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर रेणापूरसह लातूर जिल्ह्याला खारीचा वाटा मिळाला पाहिजे, पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात ही कामे झाली पाहिजेत, असे आवाहन धिरज देशमुख यांनी नाना पटोले यांना केले. दरम्यान, माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या सारख्या दलित नेत्यांवर अन्याय झाला आहे. ज्यांनी हा अन्याय केला त्यांनी आमच्या नादी लागू नये असा इशाराच धिरज देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
निगरगट्ट महायुती सरकारला खाली खेचा- डॉ. शिवाजीराव काळगे
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस बळी पडत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गृहखात्याचा कुठलाच आणि कोणावरही अंकुश नाही. आपण सर्वजण शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहोत. शेतकरी प्रचंड नैराश्यात आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशाला हे लोक दाद देत नाही. हे निगरगट्ट महायुतीचे सरकार आपल्या नशिबी आले आहे. लोकसभा निवडणुकीत व्यक्त केलेला राग केंद्रावर तर होताच त्यापेक्षा जास्त राग हा महायुती सरकारवर होता, असेही ते म्हणाले.
