आजच्या तरुण पिढीने अंधश्रध्देच्या व कर्मकांडाच्या आहारी न जाता धम्माचे आचरण करावे- माजी उपनगराध्यक्ष अरविंद कांबळे
निलंगा ,- हजारो वर्षापासून या देशातील आजचा बौद्ध व आठरापगड समाज हा येथील व्यवस्थेने लादलेल्या व अंधश्रध्देच्या , कर्मकांडाच्या साखळदंडात अडकून खितपत पडला होता.या समाजाला अश्या या साखळ दांडातून मुक्त करण्यासाठी त्याचप्रमाणे समस्त भारतीयांना समता, स्वातंत्र्य, आणि बंधूत्व बहाल करण्यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून जगातील सर्वात मोठं संविधान अगदी कमी वेळेत म्हणजे २ वर्ष ११ महिने १८ दिवसात निर्माण करून तुम्हा आम्हाला लोकशाही दिली. व या देशातल्या रंजल्या गांजल्या वर्गाला व आपणास या गुलामगिरीच्या साखळदांडातून मुक्त केले.
मात्र आजचा नवतरुण समाज दिवसेंदिवस अंधश्रध्दा कर्मकांडात अधिक प्रमाणात रुतत चालला आहे. याकरिता आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने चालून कर्मकांडाचा व अंधश्रद्धेचा त्याग करून धम्माचे आचरण करावे असे मत येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत तथा माजी उपनगराध्यक्ष अरविंद कांबळे यांनी व्यक्त केले.ते विजयादशमी दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेस संबोधित करीत होते.यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ जे. बी.(दादा) सूर्यवंशी, अरविंद कांबळे, रजनीकांत कांबळे,विजयकुमार सूर्यवंशी,इंद्रजित कांबळे,धम्मानंद काळे,संतोष गायकवाड,छगन सूरवसे, विशाल गायकवाड,रोहन सूरवसे, स्वप्नील कांबळे जितू कांबळे,पांडुरंग पात्रे,जेष्ठ महीला प्रतीनिधी गुणाबाई(काकू) कांबळे, शिलाबाई कांबळे यांच्या सह उपासक ,उपासिका बालक बालिका,मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, या देशातल्या बहुजन (बौद्ध)समाजाला मिळालेले वैभव हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या त्यागामुळेच मिळालेले आहे. हे उपकार आजची तरुण पिढी विसरून जात आहे.आणि बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पैकी एकाही प्रतिज्ञाचे पालन करीत नाहीत.त्यामुळे पुन्हा एकदा बहुजन (बौद्ध) समाज गुलामगिरीच्या खाईत जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंद्रजित कांबळे सर व विशाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले…
