उत्तर प्रदेशात अजूनही राजकीय उलथापालथ सुरूच असून इंडिया आघाडी आणखी एक धक्का बसला आहे. काही दिवसांपर्यंत समाजवादी पक्षासोबत असलेल्या अपना दल (कमेरावादी) पक्षाने एमआयएमच्या साथीने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सर्वाधिक फटका इंडियाला बसण्याची शक्यता असल्याने आघाडीतील पक्षांचे टेन्शन वाढणार आहे.अपना दलच्या (Apna Dal) नेत्या व आमदार पल्लवी पटेल आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसीयांनी आज तिसऱ्या आघाडीची घोषणा केली. पीडीएम न्याय मोर्चा (PDM Nyay Morcha) असे या आघाडीला नाव देण्यात आले आहे. पी म्हणजे पिछडा (मागास), डी म्हणजे दलित आणि एम म्हणजे मुस्लिम. या तीन समाजघटकांना राजकारणात (Latest Political News) सन्मान मिळवून देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केल्याचे या नेत्यांनी सांगितले.पीडीएममध्ये प्रगतीशील मानव समाज पार्टीसह इतर काही छोटे पक्षांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पटेल यांचा पक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत होता. पण राज्यसभा निवडणुकीपासून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर पटेल यांनी एमआयएमसोबत तिसरी आघाडी स्थापन करत अखिलेश यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.समाजवादी पक्षही पीडीएमच्या मुद्यावर सातत्याने आक्रमक होतो. आता पटेल यांनी हाच मुद्दा हायजॅक करत त्यांना धक्का दिला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पीडीएमला सन्मान दिला जात नाही. त्यामुळे सरकार आणि मुख्य विरोधी पक्षाच्या विरोधात या मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील.ओवैसी यांनी ही साथ केवळ लोकसभा निवडणूक नाही तर पुढेही कायम राहील, असे स्पष्ट केले. ओवैसी यांनी यापुर्वीच अखिलेश यांच्या पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांना पल्लवी पटेलांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे अखिलेश यांच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.