मुंबई: भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील २० उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपनं ५ विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आहे. विशेष म्हणजे यातील २ खासदार मुंबईतील आहेत. मुंबईत भाजपचे तीन खासदार आहेत. त्यातील दोन जागांवर भाजपनं नवे चेहरे दिले आहेत. तिसऱ्या मतदारसंघातही भाजप नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजप पूनम महाजन यांच्या जागी नवीन चेहरा उतरवणार असल्याची चर्चा आहे.

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. या दोन खासदारांनंतर भाजप पूनम महाजन यांचाही पत्ता कट करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या जागी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते.पूनम महाजन यांच्या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा आहेत. यात आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघाचाही समावेश आहे. २०१४ पासून शेलार या मतदारसंघातून निवडून येत आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी २५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे महाजन यांच्या जागी शेलार यांना तिकीट दिलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरेंना शिंगावर घेण्याचं काम शेलार यांनी अनेकदा केलं आहे.
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस देणार स्टार उमेदवार?
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ २००४ ते २०१४ या कालावधीत काँग्रेसकडे होता. २००४ मध्ये इथून एकनाथ गायकवाड, तर २००९ मध्ये प्रिया दत्त निवडून आल्या. पण गेल्या निवडणुकांमध्ये दत्त इथून पराभूत झाल्या. आता काँग्रेसनं या मतदारसंघात राज बब्बर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.