पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी आळंदीत समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले, असा दावा केला होता. योगी आदित्यनाथ यांच्या या दाव्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्या या दाव्याचे खंडन केले. काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खरा इतिहास काय आहे तो जगाला माहिती आहे. आमच्यादृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांनी देखील शरद पवारांच्या सुरात सुर मिसळत योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे. याच इतिहासातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो, अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निम्मिताने आयोजित ‘स्वराज्य सप्ताहा’ कार्यक्रमाच्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ यांचा दादांकडून समाचार
दरम्यान, रविवारी आळंदी येथे गीता-भक्ती अमृतमोहत्सव सोहळ्याला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले, असे विधान केले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली असे ठामपणे सांगत योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे खंडन केले आहे.
भाजपसोबत युतीत गेल्यानंतरही भूमिका कायम
तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेतून प्रेरणा घेतली असे, सांगत आपण बहुजनवादी विचारधारेसोबत कायम असल्याचे संकेत अजित पवार यांनी यावेळी दिले. या मेळाव्यात योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे अप्रत्यक्ष खंडन करून अजित पवार यांनी लाल महाल मधील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याच्या वादापासून त्यांनी घेतलेली भूमिका भाजपसोबत राजकीय युतीत गेल्यानंतरही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.