अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या भीषण अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार क्र, एमएच २१ बीएफ ९२४८ कार मध्ये ५ जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर ५०४ जवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त कंटेनर ट्रेलर क्रमांक एमएच ४६ एएफ ९८३३ ला पाठीमागून जोराची धडक दिली. यामधे स्विफ्ट कारमध्ये असलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ही धडक इतकी जोराची होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झालाय. दरम्यान, कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असल्याचे कळते. ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके आणि वाघ हे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच धोत्रे ग्रामस्थांसह कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलिस उपनिरिक्षक विशाल सनस आणि कर्मचारी तसेच क्यूआरव्ही टीम आणि एमएसएफचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी पाठवले.