ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम निवडणूक लढवत ठाकरे घराण्यातील रिमोटची परंपरा मोडीत काढली होती. यानंतर आता दस्तूरखुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे. दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल, असं सूचक वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

पुण्यातील साईनाथ बाबर यांनी MNS च्या कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका पत्नी आरती साईनाथ बाबर यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने खास महिलांसाठी “कोंढव्याची सौभाग्यवती 2024” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास शर्मिला ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचे सांगितेल. त्यामुळे साईनाथ बाबर सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अशीही चर्चा रंगली आहे. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी तोफ डागली
त्या म्हणाल्या की, साईनाथ बाबर यांना आता मला वरच्या पदावर पाहायचं आहे. त्यामुळे ठाकरे यांनी पुण्यामध्ये बोलताना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोन मोठे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या की, मार्च एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होतील. ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होतील, पुढील वर्षी महापालिका निवडणूक होतील. यावेळी बोलताना ठाकरे यांनी राजकीय भाष्य सुद्धा केले. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. कोरोना काळात सत्ताधारी पक्ष कोरोना काळामध्ये बंगल्यात बसून होते, अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती केली. कोरोना काळामध्ये आपल्या पक्षाने जेवढी काम केली, तेवढी कोणत्याही पक्षाने केली नसल्याचा दावा केला. तेव्हा सगळे सत्ताधारी बंगल्यात बसले होते, आमचा पक्ष रस्त्यावर होता. आमची चांगली मुलं कोरोनामध्ये दगावली असे त्यांनी यावेळी सांगितले.