• Tue. Jun 10th, 2025

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येऊ शकतात?

Byjantaadmin

Jan 29, 2024

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या. यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश आहे. येत्या २७ फेब्रुवारीला (मंगळवार) या ५६ जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहेत. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी, अर्ज छाननी १६ फेब्रुवारी तर २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कारण या ५६ जागांवरील निकालांनंतर भाजपचा राज्यसभेतील बहुमताचा दशकभराचा दुष्काळ संपून वरिष्ठ सभागृहात सत्तारूढ पक्ष पूर्ण बहुमतात येण्याची शक्यता आहे.भाजप, काँग्रेससह सारे राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागले असताना निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली. ही राज्यसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या जागांचा फैसला काय होतो त्यानंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे राजकीय चित्र बदलणार आहे.

कुठे किती जागा रिक्त?

निवडणुका होऊ घातलेल्या ५६ जागांपैकी लोकसभेची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातून सर्वाधिक १० जागा आहेत. भाजप सत्तेत असलेल्या महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी ६, तर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ५-५ जागा आहेत. कर्नाटक आणि गुजरातच्या प्रत्येकी ४ जागांवर, तेलंगणा, राजस्थान आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ३ जागांवर तर छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशामध्ये प्रत्येकी एकेका जागेवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात?

सध्याचे राज्यवार राजकीय चित्र पहाता भाजपला या निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड व हरियाणा या राज्यांतून मोठा फायदा मिळणार आहे. याच ७ राज्यांत भाजप या ना त्या प्रकारे सत्तेत आहे. काँग्रेसला कर्नाटक, तेलंगण व हिमाचल प्रदेशातून फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात भाजपला ३ जागा मिळू शकतात तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला एक एक जागा मिळू शकते. माजी मंत्री प्रकाश जावडेकर व काँग्रेसचे कुमार केतकर यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे (उबाठा) गटाचे अनिल देसाई, भाजपचे व्ही. मुरलीधरन व राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण हे निवृत्त होत आहेत. यातील राणे व मुरलीधरन हे केंद्रात मंत्री आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *