नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढणारे मनोज जरांगे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केलं. कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याकडे दिले. यावेळी जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या आधारे कुणबीप्रमाणपत्र देण्यात यावीत. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या कुटुंबीयांना जात प्रमाणपत्र द्यावं, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केली होती. माझ्या मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला, ३०० पेक्षा अधिक मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक घरांमधील कर्ता पुरुष गेलेला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. या कुटुंबीयांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठा समाजावर आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदी मिळालेल्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं सुरु केली. ज्याची नोंद मिळालेली आहे त्या मराठा बांधवांच्या सग्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र दिली जावीत, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र आणि अध्यादेश काढला याबाबत धन्यवाद असं मनोज जरांगे म्हणाले.महाराष्ट्राच्या वतीनं एकच विनंती आहे की, मी जीवाची पर्वा न करता उपोषण केलेलं आहे. ज्यांची नोंद मिळालेली आहे त्यांची गृहचौकशी न करता जात प्रमाणपत्र वाटप करावीत. आंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घेतले जावेत. न्या. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ दिली जावी. ओबीसी समाजाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतलाय, असं मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये, असं जरांगे म्हणाले. हैदराबादचं १८८४ चं गॅझेट लागू करावं, असं जरांगे म्हणाले.