• Fri. May 2nd, 2025

‘आमच्यासोबत या’ भाजपकडून फोन पण राजू शेट्टींचा नकार, लोकसभेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर

Byjantaadmin

Jan 18, 2024

कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी देखील याला दुजोरा दिला असून भाजप मध्यस्थी मार्फत मला संपर्क केला जात असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही लांब ठेवत स्वतंत्रपणे आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं ही त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना म्हटले आहे.

Raju shetti

भाजपकडून संपर्क मात्र अपक्ष लढवण्यावर ठाम

राजू शेट्टी आता आघाडी आणि महायुती दोघांनाही लांब ठेवत स्वतंत्रपणे आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र भाजपने राजू शेट्टी महायुती मधून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा चेहरा म्हणून राजू शेट्टी भाजपला फायदेशीर ठरतील, यामुळे भाजप मध्यस्थीकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात येत असून मला भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना आणि अमित शहा यांना भेटावे, असे मध्यस्थीकडून सांगण्यात आले. मात्र माझा निर्णय २ वर्षांपूर्वी झालेला आहे. मी कोणत्याच आघाडी आणि युतीशी संबंध ठेवायचा नाही. शेतकरी प्रश्नासाठी कोणीही नाहीये, शेतकऱ्यांचा तोटा व्हावा अशीच धोरणे सर्वांची राहिली आहेत. त्यामुळे कोणताही प्रस्ताव आला तरी चळवळीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून ही लोकसभा स्वबळावर लढवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना स्पष्ट केले.

भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई मात्र उमेदवार नाही

आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत केंद्रात सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असून भाजप एका-एका जागेचा स्वतंत्रपणे विचार करत आहे. जिंकण्याची खात्री देणाऱ्या उमेदवाराला तिकीट हाच उमेदवारीसाठी महत्त्वाचा निकष भाजपने ठेवला आहे. यामुळे सध्या जिथे महायुतीकडे ताकदवर उमेदवार नाही तेथे महायुती बाहेरील नेत्यांना संपर्क करत आहे. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. मात्र येथील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी असून उमेदवार बदलाच्या हालचाली सध्या भाजपकडून जोरदारपणे सुरू आहेत. भाजपकडून सध्या येथे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे दोघेही इच्छुक असले तरी अद्याप मतदारसंघात भाजपला हवी तशी ताकद नाहीये. यामुळे भाजप आता बाहेरील नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

सोयीस्कर भूमिका हानिकारक ठरली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. २०१४ साली महायुतीच्या पाठिंबावर राजू शेट्टी लोकसभेवर गेले. मात्र नरेंद्र मोदी यांचे शेतकरी विरोधी कायदे असल्याचे आरोप करत ते महायुतीपासून बाहेर पडले आणि आघाडी सोबत हातमिळवणी केली. २०१९ च्या निवडणुकीत राजू शेट्टी हे आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढले मात्र कधी युती आणि कधी आघाडी अशी सोयीस्कर भूमिका घेतल्याने नाराज झालेल्या मतदारांनी राजू शेट्टी लोकसभेमध्ये न पाठवता त्यांच्या हाती नारळ दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *