ईव्हीएम हटाव… संविधान आणि देश बचाव चा नारा…
निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासाठी निलंग्यात धरणे
निलंगा : प्रतिनिधी इव्हीएम मशीनवर घेण्यात येत असलेल्या निवडणुकावरील सर्व सामान्य जनतेचा विश्वास उडाल्याने देशाची लोकशाही प्रबळ करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात. या मागणीसाठी निलंगा येथे सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दि १५ जानेवारी सोमवार रोजी धरणे आंदोलन करुन उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मागणीचे निवेदन निवडणूक आयोगाला देण्यात आले.
निवेदनात इव्हीएम मशीनद्वारे निवडणूक पध्दती या अविश्वासाच्या ठरल्या असून सदरील मतदान प्रक्रिया ही संसंदीय लोकशाहीला मारक ठरणारी आहे. जनतेचा या मतदान प्रक्रियसेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जनतेची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सद्या अस्तीत्वात असलेल्या इव्हीएम मशीनद्वारे होणारी मतदान प्रक्रिया विनाअट तात्काळ रद्द करुन आगामी सार्वत्रिक निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात. जगातील अनेक प्रगत राष्ट्राकडे प्रचंड तंत्रज्ञान असूनही त्या त्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात आहेत. आपल्या देशाची लोकशाही पध्दतीचा स्वीकार अनेक देशांनी केला आहे. मात्र आपल्या देशात इव्हीएम मशीनद्वारे निवडणुका कशाला? असा प्रश्न उपस्थित करीत निवडणूक आयोगाने निवेदनाची दखल घेऊन निवडणूका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आंदोलनात ओबोसीचे नेते
प्रा दयानंद चोपणे, भटक्या विमुक्त संघटनेचे विलास माने, आरपीआय (डे) चे विलास सूर्यवंशी, रोहित बनसोडे, ओबीसी सेवा संघाचे मोहन क्षीरसागर, टिपू सुलतान संघटनेचे मुजीब सौदागर, रजनीकांत कांबळे, गणराज्य संघाचे रामलिग पटसाळगे, लहुजी शक्ती सेनेचे गोविद सूर्यवंशी, प्रबुद्ध भारतचे प्रा रोहित बनसोडे, भीमशक्ती संघटनेचे दिगंबर सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे अमोल सोनकांबळे, सोनाजी कदम, मुन्ना सुरवसे, शिवसेना ठाकरे गटाचे मुस्तफा शेख, अर्जुन कटके, विजयकुमार सुर्यवंशी, एम.डी सुर्यवंशी, बालाजी कांबळे, सईद शेख, अंकुश कांबळे, नागनाथ घोलप, बालाजी शिदे अदी उपस्थित होते.