• Tue. Jun 17th, 2025

मुंबईतील हजारो कोटींचा हिरे उद्योग सुरतला; सुप्रिया सुळेंचा भाजपवर वार

Byjantaadmin

Oct 27, 2023

महाराष्ट्रातील उद्योग गुजरात, मध्य प्रदेशसह शेजारील राज्यांमध्ये जात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील हिरे व्यापार सुरत जात असल्याच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही गंभीर आरोप केला आहे.१७ हजार कोटींचा हिरे व्यापार सुरतला चाललाय. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

”मुंबईतील हिरे उद्योग आता पूर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्याच्या कुठे चुकतेय, यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जातोय, ही खेदाची बाब आहे.”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.हिरे उद्योगावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशाची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्याचा डाव आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. हिरे व्यापार मुंबईतून नेण्याची सुरुवात ही बुलेट ट्रेन प्रकल्पापासून झाली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जोडून इथला उद्योग, व्यापार आणि अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईचा कणा मोडण्याचं काम सुरू आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.देशातील सर्वात मोठे डायमंड क्लस्टर नवी मुंबईत उभारण्यात येत आहे. देशातील सर्वच क्षेत्रात काम करणारे उद्योग हे नवी मुंबई आणि महाराष्ट्रात येतील. त्यांची गुंतवणूक आल्यावर मी स्वतः तुम्हाला माहिती देईन. गुजरातमध्ये किती उद्योग आहेत आणि MAHARASHTRA किती, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *